अपघात विमा कवच कार्यक्रम
धाराशिव,दि.२० (प्रतिनिधी) पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून,ते सर्वसामान्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वाचे कार्य करतात.त्यामुळे विकासकामांसाठी जशी लोकप्रतिनिधींची गरज असते, तशीच पत्रकारांचीही आवश्यकता असते,असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी केले.
धाराशिव येथे ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या वतीने जिल्ह्यातील पत्रकारांना अपघात विमा सुरक्षा कवच कार्डचे वितरण पालकमंत्री श्री. सरनाईक यांच्या हस्ते आज २० फेब्रुवारी रोजी आयोजित कार्यक्रमात करण्यात आले.अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री श्री.सरनाईक बोलत होते.
पत्रकारांच्या विविध मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करून योग्य तो निर्णय घेणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांसाठी स्वतंत्र कक्ष यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल,असे त्यांनी स्पष्ट केले.
धाराशिव येथील पत्रकारांना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत प्रवेश नव्हता.मात्र,पत्रकारांच्या मागणीवर तात्काळ निर्णय घेत त्यांना सभागृहात प्रवेश दिला,असेही पालकमंत्री सरनाईक यांनी सांगितले.
तुळजापूर येथे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्याचा निर्णय झाला असल्याचे सांगून श्री. सरनाईक म्हणाले,रुग्णांना पाच लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत.तुळजापूर येथे ड्रग्ज प्रकरणाची ७२ तासांत चौकशी करून कठोर कारवाई करण्यात येईल.असे ते म्हणाले.
श्री तुळजाभवानी मंदिराच्या कळस व इतर कामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिल्याचे सांगून पालकमंत्री श्री.सरनाईक म्हणाले की, राज्यातील आदिवासी भागात एसटी सेवा पोहोचावी,यासाठी ‘एसटी तेथे एसटी’ ही संकल्पना राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी लोकशाहीसाठी पत्रकारांच्या निर्भीड भूमिकेचे महत्त्व स्पष्ट केले. “लोकप्रतिनिधींनी फक्त आश्वासने न देता,त्याच्या अंमलबजावणीसाठी पत्रकारांनी पाठपुरावा करावा,”असे आवाहन त्यांनी केले.
आमदार कैलास पाटील यांनी पत्रकारांसाठी अपघात विमा सुरक्षा कवच सुरू केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.त्यांनी पत्रकारांना सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याचे आवाहन करत,शेतमालाला हमीभाव, २३ टीएमसी पाणी प्रकल्प,मेडिकल कॉलेजची सद्यस्थिती यासंबंधी प्रश्न विचारण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात २०५ पत्रकारांना अपघात विमा सुरक्षा कवच वितरित करण्यात आले.
यावेळी माजी आमदार ज्ञानराज चौगुले,नितीन लांडगे,सुधीर पाटील,व्हॉईस ऑफ मीडिया’चे राज्य सरचिटणीस चेतन कात्रे,राज्य कार्यवाह अमर चोंदे,जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे,पोस्ट बँकेचे वरिष्ठ प्रबंधक चंद्रकांत झेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे यांनी केले. सूत्रसंचालन मनोज जाधव यांनी तर उपस्थितांचे आभार मल्लिकार्जुन सोनवणे यांनी मानले.