जळकोट, दि.२१(मेघराज किलजे) :-
तुळजापूर तालुक्यातील किलज गावचे सुपुत्र व सध्या उरण (नवी मुंबई) येथे महाराष्ट्र शासनाच्या गृह खात्याच्या पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत असलेले नागनाथ कुठार यांचे पर्यावरणावर अत्यंत प्रेम आहे. किलज गावात पर्यावरण संतुलन राहण्यासाठी गाव निसर्गरम्य व्हावे. यासाठी वृक्ष लागवडीसाठी गावातील शेतकरी व नागरिकांना मोफत रोपे वाटप केले. लागवडीचा व झाड जपण्याचा संकल्पही दिला.
नागनाथ कुठार हे आपल्या गावावर खूप प्रेम करतात. निसर्ग व पर्यावरण यावर सतत कार्य करत असतात. आत्तापर्यंत त्यांनी शेकडो रोपे वाटप केले आहेत. नवी मुंबईतही त्यांचे पर्यावरणावर सतत काम चालू असते. आपल्या मायभूमीला निसर्गरम्य करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सतत चालू असतात. गावात यापूर्वीही त्यांनी वृक्ष लागवडीसाठी रोपे वाटप केले आहेत. यावर्षीचा पावसाळा सुरू झाला आहे. पावसाळ्यात वृक्ष लागवड करण्यासाठी गावातील नागरिक व शेतकरी यांना ५१ रोपे दिली आहेत. वृक्ष लागवड करून ते जोपासण्याचा संकल्प ही त्यांनी केला आहे. नागनाथ कुठार हे ग्रह खात्यात निसर्ग व पर्यावरण प्रेमी म्हणून ओळखले जातात. आपल्या मातीशी व माणसाशी नाळ घट्ट जुळावी यासाठी हा त्यांचा रोपे वाटप करण्यामागचा उद्देशही आहे. विविध फळ पिके यांचे रोपटे लावण्यासाठी शेतकऱ्यांना ते सतत मदत करतात. यावेळी गावातील शेतकरी नागरिक उपस्थित होते.