धाराशिव न्यूज रिपोर्टर
उमरगा प्रतिनिधी :- ज्ञानेश्वर गुरव
लोहारा तालुक्यातील करवंजी येथे चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यातील चवथ्या दिवशी शुक्रवारी (दि. 09)रोजी ह भ प गुरुवर्य विठ्ठल महाराज दिंडेगावकर किर्तन सेवेत बोलत होते.
आपुलिया हिता जो असे जागता । धन्य माता पिता तयाचिया ॥१॥
कुळीं कन्यापुत्र होतीं जीं सात्त्विक । तयांचा हरिख वाटे देवा ॥२॥
गीता भागवत करिती श्रवण । आणीक चिंतन विठोबाचें ॥३॥
तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा । तरी माझ्या दैवा पार नाहीं ॥४॥
या अभंगावर चिंतन केले,
सन्मार्गाने चालत असताना स्वहित साधण्याकरीता जो मनुष्य सतत प्रयत्न करीत राहतो त्यास तुकोबा माउली “जागता” म्हणजेच जागरूक मनुष्य अशी उपाधी देतात. स्वतःचा प्रापंचिक व पारमार्थिक उत्कर्ष करून घेणाऱ्या अशा मनुष्याचे माता पितादेखील अशा अपत्यांस जन्म देऊन जन्म सार्थकी झाला ह्या हेतूने कृतकृत्य होतात. असे सात्विक कन्या-पुत्र ज्या कुळामध्ये जन्म घेतात तेव्हा प्रत्यक्ष त्या श्रीहरीला देखील आनंद होतो.
साहजिकच अशा सत्पुरुषांच्या घरी विठोबाचे चिंतन करीत गीता,भागवताचे श्रवण,मनन देखील होत असते. म्हणूनच शेवटच्या दोन ओव्यांमध्ये तुकोबाराय विठू माऊलीकडे अशा सदाचारी सद्गृहस्थांची सेवा घडावी म्हणून प्रार्थना करतात.आणि आपल्या दैवाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात.
मनुष्य जन्म हा वाया घालवण्याचा अधिकार कोणालाच नसून तो सार्थकी लागावा यासाठी नामस्मरण ही साधना सर्वांनी केली पाहिजे, प्रपंचाची उठा ठेव करण्याच्या नादात भक्ती पासून दूर जाऊ नका.आणि जन्म मरणाच्या फेऱ्यात फिरू नका. भक्ती करण्यासाठी भगवंताविषयी एक निष्ठावंत भावच असला पाहिजे असे महाराज म्हणाले..
युवकांनी परमार्थ करायला पाहिजे, मुखात विठ्ठलाचे नाव पाहिजे, आपण कुठे का असेना विठ्ठलाचे भजन करावे असे दिंडेगावकर महाराज सांगितले.
यावेळी व्यासपीठाधिकारी कमलाकर बेडगे महाराज , नवनाथ शिंदे महाराज आदी मान्यवर उपस्थित होते. गावातील व परिसरातील सुपतगाव तोरंबा ,कोराळ,हिप्परगा, हराळी भजनी मंडळ भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.