नळदुर्ग / प्रतिनिधी –
नळदुर्ग येथे राष्ट्रीय महामार्ग ते खंडोबा मंदिर, नळदुर्ग ते तुळजापूर रस्ता खंडोबा मंदिर या दोन रस्त्यांच्या कामांमुळे परिसरातील नागरिकांची तसेच खंडोबा भक्तांची मोठी सोय झाली आहे. याच प्रकारचे रस्ते नळदुर्ग शहरात तयार करावेत, अशी मागणी शहरवासियांकडून होत आहे.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नांतुन नळदुर्ग शहरातील प्रलंबित विकासकामे सुरु आहेत. यामध्ये रस्त्यांची कामे, नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम, हरितक्रांतीचे प्रणेते कै.वसंतराव नाईक यांच्या स्मारकाचे काम, भीमनगर येथे बुद्धविहाराचे काम, तसेच इतर विकासकामांचा समावेश आहे. ९३ कोटी रुपये खर्चातून जी रस्त्यांची कामे सुरु आहेत, त्या रस्त्यांच्या कामांमुळे नळदुर्ग शहरातील अनेक वर्षातील रस्त्यांच्या समस्या सुटणार आहेत. या कामांपैकी सध्या राष्ट्रीय महामार्ग ते पोलीस कॉलनीमार्गे मैलारपूर येथील खंडोबा मंदिर तसेच नळदुर्ग तुळजापूर रस्त्यावरील नळदुर्ग नगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्र ते मैलारपूर येथील खंडोबा मंदिर पर्यंत या दोन रस्त्यांच्या कामांचा देखील समावेश आहे. या दोन्ही रस्त्यांची कामे अतिशय दर्जेदार आणि चांगल्या प्रकारे करण्यात येत आहेत.
अशाच प्रकारचे रस्ते नळदुर्ग शहरातील बसस्थानक ते शास्त्री चौक, शास्त्री चौक ते किल्लागेट, तसेच चावडी चौक ते छत्रपती संभाजी महाराज चौक मार्गे बोरी घाट हे शहरातील महत्वाचे रस्ते तयार करावेत, अशी शहर वासियांतून मागणी होत आहे.