धाराशिव प्रतिनिधी :-
काळाच्या पटलावर राजमाता आहिल्यादेवी होळकर यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने अभिमानास्पद आणि प्रेरणादायी आलेख कोरला आहे. आहिल्यादेवी या खऱ्या अर्थाने स्त्री सक्षमीकरणाचे अमूल्य असे प्रेरणास्थान आहेत. तुळजापूरमध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे भव्य स्मारक साकारण्यात येणार आहे. हे केवळ स्मारक नसून त्याठिकाणी अद्ययावत प्रेरणा केंद्र आणि मदत केंद्रही उभारण्याची योजना असल्याचे सांगत लोकसहभागातून पुतळा उभारणीसाठी निधी संकलनाची सुरुवात म्हणून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शनिवारी एक लाख रुपयांचा सक्रिय सहभाग दिला.
पुण्यश्लोक राजमातांच्या भव्य स्मारकासाठी एक कोटी रुपयांचा निधी यापूर्वीच उपलब्ध झाला आहे. त्यातूनच हे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकात केवळ पुतळाच नव्हे, तर प्रेरणा केंद्र आणि मदत केंद्रही उभारण्याची योजना आहे. यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग देण्याचे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले. याप्रसंगी पुतळा हा लोकसहभागातून उभा करण्याचा निर्धार करण्यात आला व लोकसहभागातून निधी संकलनही सुरू करण्यात आले. प्रारंभी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी स्वतः ₹१,००,०००/-चा निधी देत या लोकसहभाग कार्याचा शुभारंभ केला. अठराव्या शतकात स्त्रियांना सामाजिक बंधनांत अडकवले गेले असताना, पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी स्त्री सक्षमीकरणाचे उदात्त कार्य उभारले. त्यांनी सुरू केलेल्या महेश्वरी साडी उद्योगाने महिलांना केवळ आर्थिक स्वावलंबनच दिले नाही, तर स्वाभिमान व आत्मसन्मानाचे भानही दिले. महेश्वर येथे कुशल विणकरांना बोलावून, स्थानिक महिलांना प्रशिक्षण देत त्यांनी समाजात क्रांतिकारी बदल घडवून आणला असल्याचेही आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी तुळजापूर येथील छत्रपती संभाजी महाराज उद्यानाशेजारी भव्य स्मारक उभारण्यात येत आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये या स्मारकाचे भूमिपूजन झाले व कामास सुरुवात देखील झाली आहे.जयंतीच्या औचित्य साधत त्या कामाची आमदार पाटील पाहणी देखील केली.मागील पाच दशकांपासून स्थानिक पातळीवर या पुतळ्याची मागणी होत होती, ती अखेर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे पूर्णत्वास जात आहे. “हे स्मारक माझे आहे, त्याच्या बांधणीत माझा सहभाग आहे,” असे प्रत्येक नागरिकाला वाटायला हवे, असे आवाहन आमदार पाटील यांनी केले. तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकांना हे स्मारक प्रेरणादायी ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. हे स्मारक केवळ ऐतिहासिक नव्हे, तर सामाजिक आणि आध्यात्मिक जागृतीचे केंद्र ठरेल. सुशासन, न्याय आणि अध्यात्म यांचे प्रतीक असलेल्या अहिल्याबाई होळकरांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहचवण्याचे हे एक सशक्त पाऊल ठरेल, असा विश्वासही आमदार पाटील यांनी व्यक्त केला आहे.