शिक्षक-विद्यार्थ्यांच्या नात्यांचा भावस्पर्शी संगम, बालपणीच्या आठवणींना तेजोमय उजाळा….
मुरूम, ता. उमरगा, ता. २६ (प्रतिनिधी) : –
येथील ज्ञानदान विद्यालयातील इयत्ता दहावीच्या बॅच १९९९ चा स्नेहमेळावा रविवारी (ता. २५) रोजी उत्साहात आणि भावनांच्या भरगच्च वातावरणात शहरातील मालपाणी मंगल कार्यालयात पार पडला. पावसाच्या पार्श्वभूमीवर शाळेऐवजी बंद सभागृहात हा सोहळा आयोजित करण्यात आला. उपस्थितांचे पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात आले आणि दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमात “एक शिक्षक – एक विद्यार्थी” या संकल्पनेखाली अनेकांनी आपल्या मनोगतांद्वारे जुन्या आठवणी जागवल्या. बालपणीच्या खोडकर क्षणांपासून ते शिक्षकांच्या शिकवणीपर्यंत अनेक क्षणांना उजाळा देताना अनेकांनी संत साहित्य, राष्ट्रपुरुषांचे पराक्रम आणि समाजातील महानायिकांच्या संघर्षाचे प्रेरणादायी दाखले दिले. या स्नेहसंमेलनात तत्कालीन मुख्याध्यापक नागाप्पा करपे यांच्यासह माणिक लूल्ले, शंकरराव माने, राजशेखर खुणे, प्रकाश रोडगे, मुख्याध्यापक गुरप्पा कुंभार यांचा विद्यार्थ्यांनी सन्मान केला. प्रमुख पाहुणे माजी नगरसेवक चंद्रशेखर मुदकण्णा व प्रभाकर मदने यांनीही आपले विचार मांडले. विद्यार्थ्यांनी गाणी, किस्से, शाळेतील आठवणी शेअर करत पुन्हा एकदा ‘शाळकरी’ दिवस जगले. कार्यक्रमाच्या शेवटी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. शाळेने घडवलेले हे विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत कार्यरत असले तरी, त्या दिवशी प्रत्येकजण मनाने पुन्हा विद्यार्थीसारखा होत एकमेकांशी प्रेमाने, आत्मीयतेने भेटले. या स्नेहमेळाव्याने ज्ञानदान विद्यालय ही केवळ एक शिक्षणसंस्था नसून ती जीवनमूल्यांची शिदोरी आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश वडदरे यांनी स्नेहसंमेलनाची कल्पना आणि तयारी यावर प्रकाश टाकत सर्वांचे स्वागत केले. सूत्रसंचालन दिनेश बडूरे तर आभार नहिरपाशा मासूलदार यांनी मानले.