धाराशिव / प्रतिनिधी :-
महाराष्ट्र शासनाने राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मोठ्या बदल्या केल्या असून, या बदल्यांतर्गत रितु खोकर (भा.पो.से.) यांची धाराशिव जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्या यापूर्वी सांगली येथे अपर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होत्या.
धाराशिवचे विद्यमान पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची या बदल्यांमध्ये बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी आता रितु खोकर या जिल्ह्याच्या पोलीस यंत्रणेची धुरा सांभाळणार आहेत. गृह विभागाच्या ए.डी.-10010/25/2025/पोल-1 या क्रमांकाच्या आदेशानुसार ही बदली जाहीर करण्यात आली आहे.
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अधिक चांगली करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने एकाचवेळी २० पेक्षा अधिक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. धाराशिव जिल्ह्यासाठी रितु खोकर यांची नियुक्ती हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे.
नवीन पोलीस अधीक्षक रितु खोकर यांच्याकडून जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.