उमरगा -प्रतिनिधी
आईशिवाय जन्म नाही तसेच गुरुशिवाय मोक्ष नाही. त्यामुळे जीवनात येऊन गुरु करावा व तुळशीशीची पवित्र माळ घालावी. गुरूंनी सांगितलेल्या गुरुमंत्राचा जप करावा. जीवनात फक्त साधना तारते तर देवाचे नाम मोक्ष मिळवून देतो,या जीवनात गुरुशिवाय पर्याय नाही, असे आशिर्वचन पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संस्थांनाचे सह-अध्यक्ष सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले*.
लोहारा तालुक्यातील करवंजी येथील श्री हनुमान मंदिरात रौप महोत्सवी अखंड हरीनाम सप्ताह सोहळ्यानिम्मित आयोजित किर्तन सेवेत औसेकर महाराज यांनी श्री संत एकनाथ महाराज यांच्या ” नमावे हे नित्य सद्गुरूचे पाय ! आणिक उपाय करू नका !!गुरुचरणावीण मानू नका काही ! वेदशास्त्र पाही हेची सांगे !!एका जनार्दनी गुरुचरणसेवा ! प्रिय होय देवा सर्वभावे !! या अभंगावर निरूपण केले.
आपण नेहमी सद्गुरूच्या चरणांना नमन करा आणि इतर उपायांची गरज नाही.सद्गुरूच्या मार्गदर्शनावर आणि त्यांच्या कृपेवर विश्वास ठेवा आणि इतर साधनांपेक्षा जास्त लक्ष देऊ नका. सद्गुरूच्या चरणांना नमन करणे हेच आपल्यासाठी सर्वोत्तम उपाय आहे. देवाचे नाम मोक्ष मिळवून देतो,परमार्थात मनोनिग्रह आणि इंद्रिय निग्रह अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे देवाचे नामस्मरण करणाऱ्याला भगवंतापर्यंत पोहचण्यास कसलीही आडकाठी नाही. गुरूंनी दिलेल्या मंत्राचा जप करावा, कोणताही संप्रदाय,धर्म, पंथ असो त्याचे नाव बदलत असेल तरीही तत्व मात्र बदलत नाहीत. प्रत्येकानी देव देवतांचा, गुरूंचा आदर केला पाहिजे. विठ्ठल नामात खूप ताकद आहे.आचरणातुनच जीवनाची वाटचाल सकारात्मक दिशेने जाते.असे गुरुवर्य गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.
याप्रसंगी व्यासपीठ अधिकारी कमलाकर बेडगे, गुलाब पांचाळ महाराज, सुग्रीव कोळी गुरुजी , नागनाथ कोळी, पोपट हाक्के, शेखर सगर , काशिनाथ करके, रमेश लामजने, नवनाथ शिंदे महाराज , चंद्रकांत हेंडले, मोहन गुरव,सतीश मुगळे,मुळे महाराज तसेच करवंजी व परिसरातील सुपतगाव, तोरंबा, हराळी, कोरळ, हिप्परगा, येणेगूर, सालेगाव येथील भजनी मंडळ सह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.